Type Here to Get Search Results !

खोपोली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम : पूरग्रस्तांसाठी दिले एक दिवसाचे वेतन!

* अस्मानी संकटात सामाजिक जबाबदारीचे भान जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी खोपोली नगर परिषदेचा पुढाकार

खोपोली / प्रतिनिधी :- महाराष्ट्रात यंदा सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांची कापणीला आलेली पिके पाण्याखाली गेली, तर हजारो कुटुंबांचे निवासस्थान आणि उपजीविका कोलमडून पडली. अशा कठीण काळात खोपोली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक संवेदनशील उदाहरण निर्माण केले आहे.


खोपोली नगर परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून, एकूण रक्कम रु. 4.14 लाख इतकी मदत पूरग्रस्तांसाठी देण्यात आली आहे. ही मदत केवळ आर्थिक योगदान नसून, समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि एकात्मतेचा संदेश देणारी आहे.


* पूरस्थितीमुळे जनतेवर आलेले संकट :- यावर्षी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, काहींचे जनावरे दगावली, तर अनेकांनी घर आणि संसार गमावले. राज्यभरातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू असताना, खोपोली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपला “खारीचा वाटा” उचलत संवेदनशीलतेचा नवा आदर्श ठेवला आहे.


* सामाजिक जबाबदारीचे भान जपणारा निर्णय :- नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि विभागप्रमुखांनी एकमुखाने घेतलेला हा निर्णय समाजात प्रशंसनीय ठरत आहे. अधिकारी वर्गाने केवळ प्रशासनिक जबाबदारी न निभावता, मानवी मूल्यांची जपणूक करीत प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे केला आहे.


या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि जनप्रतिनिधींनी खोपोली नगर परिषदेच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. नगर परिषदेच्या या कार्यामुळे सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण झाला असून, राज्यातील इतर शासकीय यंत्रणांनाही प्रेरणा मिळत आहे.


स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करीत प्रतिक्रिया दिली की, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःहून मदतीचा निर्णय घेणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उचललेले हे पाऊल म्हणजे खरी लोकसेवा आहे. खोपोली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा निर्णय केवळ मदत नाही, तर तो मानवी मूल्ये आणि संवेदनशील प्रशासनाचे प्रतीक आहे. अस्मानी संकटात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ही कृती निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.


Post a Comment

0 Comments